टिळक-आगरकरांची वृत्तपत्रीय परंपरा - दुसरी बाजू


लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी "केसरी-मराठा'तून, तसेच नंतर आगरकरांनी स्वतंत्रपणे "सुधारक'मधून केलेली पत्रकारिता हा आजही आदर्श मानली जाते. ती आदर्श आहेच, यात शंकाच नाही. मात्र त्यांची पत्रकारिताही निष्कलंक नव्हती! रा. के. लेले यांनी आपल्या इतिहासग्रंथात हे स्पष्टपणे नोंदविण्याचे धैर्य दाखविले आहे.

त्यांच्या पुस्तकातील हा उतारा टिळक-आगरकरांच्या पत्रकारितेची दुसरी बाजू लख्ख प्रकाशात आणतो. -
""1893 च्या ऑगस्ट महिन्यात मुंबईत हिंद-मुसलमानांचा भयंकर दंगा झाला. हिंदुंनी चालविलेल्या गोरक्षणासारख्या चळवळीमुळे दोन्ही जमातींत वैमनस्य निर्माण होते व त्याची परिणती जातीय दंगलीत होते, असे मत ऍक्‍स्वर्थ व व्हिन्सेंट यांच्यासारखे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी व "टाइम्स ऑफ इंडिया' सारखे अँग्लो-इंडियन वर्तमानपत्र सतत मांडीत होते.... अशा स्थितीत "आपले मत काय आहे ते स्पष्टपणे सरकारला वेळीच कळविले पाहिजे' असे वाटल्यामुळे टिळक व माधवराव नामजोशी यांनी पुढाकार घेऊन 10 सप्टेंबर 1893 रोजी शनिवारवाड्यापुढे हिंदूंची एक जंगी सभा भरवली. ही सभा भरवू नये म्हणून न्या. मू. रानडे यांनी प्रामुख्याने प्रयत्न केले. त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांनी साथ दिली. आगरकरांनी टिळकांविरुद्ध रानडे-गोखल्यांची बाजू उचलून धरली. पण टिळकांनी विरोध बाजूला सारून सभा भरविलीच. सभा झाल्यानंतर "ज्ञानप्रकाश' पत्राने 14 सप्टेंबरच्या अंकात "तीन खोट्या गोष्टी' लिहिल्या. त्यातून वाद पेटला.

18 सप्टेंबरच्या "सुधारका'च्या अंकात आगरकर वादात उतरले. "हिंदूंच्या जंगी सभेने कोणता दिग्विजय लावला?' या मथळ्याचे संपादकीय लिहून आगरकरांनी टिळकांवर हल्ला चढवला. "ज्यांच्या मेंदूस धनुर्वात किंवा अर्धांगवायू झाला नाही; ज्यांचे भाषण, लेखन व आचरण पाहिले असता विधात्याने सर्व शहाणपण एकत्र करून त्याचे हे मूर्तिमंत पुतळे ओतले आहेत की काय, असा भास होतो; ज्यांचा शब्ददुंदुभी वाजू लागला की सारा समाज ते सांगतील तसे नाचण्यास सज्ज होतो; सारांश, ज्यांना या महाराष्ट्रभूमीचे अनभिषिक्त राजे म्हणण्यास हरकत नाही त्यांनी स्वल्प अडचण दिसल्याबरोबर ग्रामसिंहाप्रमाणे शेपटी खाली घालावी, आपल्या शीलास अगदी उलट वर्तन करावे ही केवढी शरमेची गोष्ट आहे बरे! ज्यांचा संसर्ग लोकास महारोग्याच्या संसर्गाप्रमाणे वाटू लागला आहे त्यांनी त्याशी फिरून सलगी व जे जात्या खुनशी, घमेंडखोर व अत्यंत नीच आहेत, त्यांनी वंद्य सज्जनावर निष्कारण तुटून पडण्याचा व त्यावर भलतेच आरोप आणण्याचा अधमपणाचा प्रयत्न करू नये तर केव्हा करावा?' अशा प्रकारची टीका व विशेषतः आगरकरांनी केलेला अपशब्दांचा वर्षाव यामुळे टिळक अगदी प्रक्षुब्ध होऊन गेले. त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्या सर्वांचा सणसणीत समाचार घेतला.

"अधीर तरतरीचे व अविचारी अतएव परप्रत्ययनेय बुद्धीचे तरुण सेक्रेटरी,' असा टोला गोखल्यांना टिळकांनी मारला. पण आगरकरांवर मात्र ते तुटून पडले, त्यांनी लिहिले, "स्वतः करवत नाही व दुसऱ्याने केलेले पाहवत नाही अशा मनुष्यास गवताच्या गंजीवरील कुत्र्याची उपमा देत असतात. चतुःशृंगीच्या मैदानावरील गंजी जळल्यामुळे अगर दुसऱ्या काही कारणामुळे आमच्या येथील अशा प्रकारचा एक गंजीवरील कुत्रा अगदी पिसाळला आहे व ज्याच्या त्याच्यावर तोंड टाकण्याखेरीज त्यास दुसरा मार्ग काहीच दिसत नाही. सभेचे हेतू, उद्देश आणि ठराव हे या लेखकास मान्य आहेत, असे त्याच्या पहिल्या लेकावरून सिद्ध होते, मग आमच्या सभेच्या चालकास व्यर्थ शिव्या देण्याचा हेतू एम. ए. झालेल्या मनुष्याचा मेंदू किती सडका असतो हे दाखविण्यापेक्षा दुसरा काही एक नव्हता, असे म्हणावे लागते... सुधारकांच्या अग्रणीचे राजकीय बाबतीत अनुकरण न केले तर आमच्यावर मोठा प्रसंग गुजरेल असे गावाबाहेर महारोग्याप्रमाणे राहणाऱ्या या सुधारकाच्या पितमाह एडिटरास वाटत आहे... सभेचे उद्देश व ठराव काय आहेत याची पूर्ण माहिती झाली असताही पुन्हा खोट्यानाट्या गोष्टी लिहून आपल्या व्यवसायबंधूबद्दल सरकारचे मन कलुषित करणे यापेक्षा जास्त नीचतेचा किंवा अधमपणाचा प्रकार मनुष्य अशी संज्ञा धारण करणाऱ्याकडून घडेल असे आम्हा वाटत नाही... गवताच्या गंजीजवळ राहून हे राजेश्री गवत खात नाहीत हे भर्तुहरी म्हणतात त्याप्रमाणे पशूंचे भाग्य समजावयाचे!' (केसरी, 19 सप्टेंबर 1893)

टिळक आगरकर यांची आणखी एका प्रसंगाने अशीच झटापट होऊन प्रकरण न्यायालयापर्यंत जाण्याचा प्रसंग आला होता.... ''

हे प्रसंग सांगून लेले लिहितात, ""टिळक व आगरकर यांच्यामधील वाग्‌युद्धाचा हा इतिहास उद्वेगजनक आहे. समाजसेवेचे कंकण बांधून पत्रव्यवसाय करणाऱ्या या दोन थोर संपादकांनी एकदा वादाला तोंड फुटल्यावर तारतम्य न ठेवता एकमेकांवर हवी तशी चिखलफेक केली.... टिळक-आगरकरांतील वाद आता ऐतिहासिक बाब झाली असली तरी वैयक्तिक टीकेची अनिष्ट परंपरा पुष्ट करण्यास या दोघा मातबर संपादकांनी हातभार लावला ही गोष्ट नाकारता येणार नाही.''

"केसरी' व "सुधारक' या दोन्ही पत्रांमधील अशा मजकूरामुळे त्यांच्यावर तत्कालीन वाचकांनी, अन्य संपादकांनी टीका केली होती. "अरुणोदय' या पत्राने आधी एका प्रसंगी टीका केली होती, ती अशी -
दोघेही "विचारशून्य, ज्ञानशून्य व हलकट' ""... मंगळवारची सिंव्हगर्जना ऐकावी अशी उत्सुकता होऊन व सिंव्ह हा राजा असल्यामुळे आपल्या थोर स्वभावावर जाईल असे वाटले होते पण तोही बिचारा विकारवशतेच्या पिंजऱ्यात सापडून कोल्ह्यासारखी कोल्हेकुई करू लागला हे वाचल्याबरोबर मात्र अतिशय वाईट वाटले.... गेल्या सुधारकात तुळशीबागेतील 5000 लोकांस "विचारशून्य', "ज्ञानशून्य' व "हलकट' असे म्हणण्यात आले आहे व गेल्या केसरीत राव. ब. रानडे प्रभृती मंडळीस अशा प्रकारच्या पण किंचित सभ्य अशा शिव्या देण्यात आल्या आहेत.'' (अरूणोदय, 2 नोवहेंबर 1890)

यावर वेगळी मल्लीनाथी करण्याची काही आवश्‍यकता आहे काय? पुढे अनेक पत्रांनी टिळक-आगरकरांचा हा वारसा नेटाने चालविला!

संदर्भ -
वृत्तपत्रांचा इतिहास - रा. के. लेले, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, प्रथमावृत्ती 1984, पृ. 331 ते 334.

5 comments:

Unknown said...

this is a Hatake site...also gives good and rare info of history...

Nadeem said...

Namaskar. Blog Aavadala. Dhanyawad Aaplya Lekhanbaddal.

Anonymous said...

Hi,

We have shortlisted this article for Netbhet eMagazine Nov 2010. We seek your permission for incorporating this article in magazine.
Please provide your full name and email id.
Please write to salil@netbhet.com or call Salil Chaudhary - 09819128167 for more information.

Regards,
Sonali Thorat
www.netbhet.com

Unknown said...

टिळक यांनी लिहिलेला "या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा संपूर्ण अग्रलेख असल्यास त्याची लिंक द्यावी.

Unknown said...

खूप छान माहिती आहे. अतिशय मार्मिक शब्दांत माहिती पुरविण्यात आली असेल.

नमस्कार ,
'१०० पुस्तकांपेक्षा १ उच्च प्रतिचे माहिती देणारे पुस्तक नेहमीच चांगले' या तत्वांला अनुसरून आम्ही VISION UPSC MPSC PO ह्या संपूर्ण मराठीमोळ्या YouTube चॅनेलची निर्मिती केली आहे.
गरजू व हुशार विद्यार्थी मित्रांना व मैत्रिणींना Private Classes च्या जाळ्यातून मुक्त करून Quality Free Education देण्याच्या उद्देश्याने तसेच त्यांच्या मूल्यवान वेळात अतिशय महत्वाची माहिती एकत्रितपणे देणे हेच आमचे ध्येय आहे.
माझ्या चॅनेलच्या काही विडीओची लिंक खाली दिली आहे , एकदा आपण video पाहून स्वतः विडीओमधील माहिती आपणांस किती उपयुक्त ठरणारी आहे हे ठरवावे.
Telegram Channel name : @visionump
Youyube channel name : VISION UPSC MPSC PO

प्राचीन भारताचा इतिहास - कालक्रम https://youtu.be/ozUiFABdydA

मध्ययुगीन भारताचा इतिहास - कालक्रम : भाग १ https://youtu.be/a67cdfA3Svk

मध्ययुगीन भारताचा इतिहास- कालक्रम : भाग २ https://youtu.be/wl9Vg5KhvIA

आधुनिक भारताचा इतिहास- कालक्रम (इ.स.१६००-१८५७) https://youtu.be/h_0syxLPsbw

आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१८५७–१९४७) https://youtu.be/ee79-cm1_C0

आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१९४७-२०००) https://youtu.be/rbMQzjLJSIU

तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.