शोध गणेशाचा

आपण देवबाप्पा वगैरे म्हणतो.
पण म्हणून कोणी कृष्णबाप्पा, शंकरबाप्पा असे काही म्हणत नाही.
तो आपलेपणाचा मान केवळ गणरायाचा.
गणपतीवर आपले प्रेम असते.
आणि म्हणूनच त्याच्याबद्दल मनस्वी कुतूहलही.

गणेशाचे हे सर्वांगसुंदर रूप कुठून आले?
त्याचा उगम कुठला?
तो एकाच वेळी विघ्नकर्ता, विघ्नहर्ता कसा?
गणांचा नायक आणि विनायक कसा?
ब्रह्मणस्पती तो तर कोणी वेगळाच म्हणतात...

गणेशाच्या या गूढाचा हा शोधप्रवास.

यापूर्वी याच स्थळी असलेला एक छोटेखानी लेख
शोध गणपतीच्या मूळ रूपाचा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आणि हा ताजा लेख लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीतला.
या विषयावरील एक अधिकारी व्यक्ती असलेल्या डॉ. मधुकर ढवळीकर यांचा.
गज.गण. गणेश  हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आग्र्याहून सुटका अन् पेटा-याची सुरस कथा


शके १५८८ पराभव संवत्सरे, ज्येष्ठ शुद्ध द्वितीया राजश्री शिवाजी राजे आगरिया जाऊन औरंगजेबाची भेट घेतली. बिघाड होऊन राजश्रीस चौकिया दिल्या. श्रावण वद्य द्वादशी आगरियातून पेटारियात बैसोन पळाले. यावरी राजश्री संभाजी राजेसह वर्तमान मार्गशीर्ष शुद्ध पंचमीस रायगडास आले.
- जेधे शकावली.
ही ३४७ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नव्हे, तर सबंध हिंदुस्थानच्या इतिहासातील ही एक रोमहर्षक आणि तितकीच महत्त्वाची घटना आहे. अशी घटना की जिने हिंदुस्थानच्या इतिहासालाच वळण लावले.
मोगल पातशहाच्या राजधानीतून, त्याच्या कैदेतून आजवर कोणी सहीसलामत निसटू शकले नव्हते.
प्रत्यक्ष औरंगजेबाच्या बापाचे शाहजहानलाही ते जमले नव्हते.
पण शिवाजी महाराजांनी ते करून दाखविले.
आणि असे केले, की पुढे आयुष्यभर औरंगजेब बादशहा त्या एका घटनेबद्दल स्वतःला कोसत राहिला. पश्चात्ताप करीत राहिला.
ती तारीख होती – १७ ऑगस्ट १६६६.


पण या घटनेस प्रारंभ होतो तो १२ जून १६६५ रोजी.
त्या दिवशी मोगल सेनापती मिर्झा राजे जयसिंग आणि महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला. पुढे मिर्झा राजांनी महाराजांना आग्र्यास पाठविले. ते गोळकोंड्याच्या कुतुबशहाला जाऊन मिळतील असे भय मिर्झा राजांना वाटत होते. महाराजांची औरंगजेबाच्या दरबारात जाण्याची मुळीच इच्छा नव्हती. पण मिर्झा राजांनी आग्रह धरला. त्यांना जावे लागले.

जयपूरच्या दफ्तरखान्यातील राजस्थानी हिंदीच्या डिंगल या बोलीभाषेत लिहिलेल्या पत्रसंग्रहानुसार, राजे ११ मे १६६६ रोजी आग्र्याजवळील मलूकचंद सराई येथे पोचले. १२ मे रोजी ते आग्र्यात आले.
त्याच दिवशी त्यांची आणि औरंगजेबाची पहिली आणि अखेरची भेट झाली.

रामसिंगचा रजपूत सरदार परकालदासचे पत्र सांगते –
या अवधीत बादशहा हा दिवाण-ए- आममधून उठून गुसलखान्यात (दिवाण-ए-खास) जाऊन बसला होता. शिवाजी गुसलखान्यात आला. बादशहाने बख्शी असदखान याला आज्ञा केली, की शिवाजीला घेऊन या आणि मुलाजमत (भेट) करवा. असदखानाने शिवाजीला बादशहापाशी आणले. शिवाजीने एक हजार मोहरा आणि दोन हजार रुपये बादशहा नजर केले. आणि पाच हजार रुपये निसार म्हणून (म्हणजे ओवाळून टाकण्यासाठी) ठेवले. यानंतर शिवाजीचा मुलगा संभाजी पुढे झाला. त्याने पाचशे मोहरा आणि एक हजार रुपये नजर म्हणून आणि दोन हजार रुपये निसार म्हणून दिले.
यानंतर शिवाजीला ताहिरखानाच्या जागेवर राजा रायसिंग याच्यापुढे उभे करण्यात आले. बादशहा काहीच बोलला नाही.
तो दिवस बादशहाच्या वाढदिवसाचा होता. समारंभाचे पानविडे शहाजादे आणि उमराव यांना देण्यात आले. शिवाजीलाही हा विडा देण्यात आला. यानंतर शहाजादे, मुख्य प्रधान जाफरखान आणि राजा जसवंतसिंग यांना खिलतीची वस्त्रे देण्यात आली. यावर –
तब सेवो दिलगीर हुवो, गुस्सा खायो, गलगलीसी आख्यां हुवो.
शिवाजीला क्षोभ झाला. त्याला क्रोध आला आणि त्याचे डोळे क्षोभाने पाणावले. हे बादशहाच्या दृष्टीस पडले. त्याने कुमार रामसिंगाला आज्ञा केली, शिवाला विचारा की काय होत आहे? रामसिंग शिवाजीपाशी आला. तसे त्याने म्हटले –
तुम देखो, तुम्हारा बाप देख्या, तुम्हारा पातशाही देख्या. मैं ऐसा आदमी हों यु मुझे गोर करने खडा रखो. मैं तुम्हारा मन्सीब छोड्या. मुझे खडा तो करीना सीर रख्या होता.
तुम्ही पाहिलेत, तुमच्या वडिलांनी पाहिले, बादशहाने पण पाहिले आहे, की मी कशा प्रकारचा मनुष्य आहे. असे असूनही मला मुद्दाम इतका वेळ उभे करण्यात आले. मी तुमची मन्सब टाकून देतो. मला उभे करायचे होते तर रीतसर व्यवस्थितपणे आणि योग्य पद्धतीने करायचे होते.
(थोर इतिहाससंशोधक सेतुमाधवराव पगडी यांच्या मते परकालदासच्या पत्रात आलेले हे हिंदी उद्गार प्रत्यक्ष महाराजांच्या तोंडचे असावेत. परकालदासच्या हिंदीकडे निर्देश करून ते सांगतात, महाराजांनी आग्र्यात रजपूत आणि इतरांशी हिंदीत बोलावे लागे.)

यानंतर महाराजांना कैद करण्यात आले. त्यांना राहअंदाजखानाच्या वाड्यात नेण्यात यावे, अशी आज्ञा बादशहाने शिद्दी फौलादला केली. राहअंदाजखान हा आग्र्याचा किल्लेदार होता.
१४ मे रोजी त्याच्या हवेलीत महाराजांची हत्या करण्यात येणार होती. परंतु रामसिंग त्यांना जामीन राहिला आणि महाराज बचावले.
महाराजांना त्यांच्या तळावरच कडक बंदोबस्तात ठेवण्यात आले.
त्यानंतर बादशहाने महाराजांना निरोप पाठविला, की तुम्ही आपल्याजवळील किल्ले मला देऊन टाका. मी तुमची मन्सब बहाल करतो.
महाराजांनी त्याला नकार दिला. तशातच रामसिंगाचे राजपूत सैनिक त्याच्या राज्यातून आग्र्यास येत असल्याची खबर बादशहाला लागली. त्याला यात कटाचा संशय आला आणि त्याने शिद्दी फौलाद आणि तोफखान्याला हुकूम दिला – सेवा को जाई पकडी मारो. शिवाजीला धरून मारा.
पण रामसिंगाने सैन्याबद्दल खुलासा केला. शिवाय बेगम जहानआरा हिने महाराजांना ठार मारू नका असे निक्षून सांगितले. मिर्झा राजे जयसिंग यांचा कौल घेऊन शिवाजी येथे आला आहे. त्याला मारलेत तर आपल्या वचनावर कोण विश्वास ठेवील, असा तिचा सवाल होता.

नंतर हळूहळू महाराजांनी आपल्या सोबत आणलेल्या लोकांना स्वराज्यात पाठविण्यास सुरूवात केली.
रामसिंगलाही आपली जामिनकी मागे घेण्यास सांगितले.
१४ ऑगस्टला औरंगजेबाने महाराजांच्या भोवती चौकी-पहारे कडक केले. त्याना विठ्ठलदासांच्या हवेलीत नेऊन ठेवण्याचा हुकूम केला.
ते याबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी रामसिंगच्या तळावर गेले, तर रामसिंगने त्यांना भेट नाकारली. थोडा वेळ वाट पाहून महाराज परत गेले.
तब सेवौ जाणौ अब बुरा हौ, तब भाग्यो.
तेव्हाच त्यांनी ओळखले, की आता अनर्थ होणार. त्यांनी आग्र्यातून निघून जाण्याचा निर्णय घेतला आणि १७ ऑगस्टला त्यांनी पिंजरा फोडला.

(रजपुतांच्या पत्रात ही तारीख १८ ऑगस्ट आहे, तर आलमगीरनामा या औरंगजेबाच्या अधिकृत आणि समकालीन चरित्रात ती २० ऑगस्ट आहे, असे सेतुमाधवराव सांगतात.)


पेटा-याची सुरसकथा

महाराजांच्या तळावरील पहा-यांची स्थिती पाहा.
महाराजांच्या राहण्याच्या जागेभोवती आतील पहा-यावर रामकृष्ण ब्राह्मण, जिवा जोशी, श्रीकृष्ण उपाध्याय आणि पुरोहित बलराम ही कुमार रामसिंगाची खास मंडळी होती. देवडीच्या दरवाजाबाहेर बर्कंदाजांचा पहारा होता. तळाभोवती राजस्थानातील चौफर मीना या जमातीच्या शिपायांचा पहारा होता. त्यांच्या मागे बादशाही सैनिक असत आणि शेवटी शिद्दी फौलादखानाच्या सैनिकांचा पहारा होता. 
मुंगीलाही प्रवेश करणे कठीण जावे अशा या चौकी-पहा-यातून महाराज निसटले. पण कसे?
सर्वसामान्य मान्यता अशी, की ते मिठाईच्या पेटा-यात बसून निसटले.
या पेटा-यांच्या कहाणीचा पहिला उल्लेख येतो तो राजस्थानी पत्रांत. हे पत्र परकालदासचे आहे आणि ते ३ सप्टेंबर १६६६चे आहे. तो लिहितो –
दिवस चार घटका वर आला असता बातमी आली, की शिवाजी पळाला. चौक्या-पहा-यांवर एक हजार माणसे होती. तो नक्की कोणत्या क्षणी पळाला आणि कोणत्या चौकीतून पार झाला. त्यावेळी कुणाचा पहारा होता, हे कोणीही सांगू शकले नाही.
तेंठा याछे मनसुबो कर और या लहरी छे भागवा की, यो वेंकी पट्यरां कीं आमगरफ्त भी सो पट्यारा मे बैठ निकल्यो.
मग शेवटी विचारविनिमय करून असा निष्कर्ष निघाला की, पेटा-यांची ये-जा होती. त्यामुळे तो पेटा-यांत बसून निघाला असावा.

मोगलांचा इतिहासकार भीमसेन सक्सेना हा यावेळी औरंगाबादेस होता. तो तारीखे दिल्कुशा या आपल्या आत्मचरित्रात लिहितो –
देवाचा प्रसाद म्हणून शिवाजी दर गुरूवारी मिठाईचे मोठमोठे पेटारे बाहेर वाटण्यासाठी म्हणून पाठवू लागला. हे पेटारे इतके मोठे असत की एकेक वाहून नेण्यासाठी काही माणसे लागत. मिठाई वाटण्याच्या वेळी शिवाजीच्या निवासस्थानाच्या दरवाजाबाहेर खूप गर्दी जमू लागली. पोलादखानाच्या माणसांबरोबर शिवाजीने अशी काही वागणूक ठेवली की ते लोक त्याच्या भजनी लागले.
आणि मग एक दिवशी शिवाजीने एका माणसाला आपल्या पलंगावर झोपविले. मिठाईचे दोन पेटारे रिकामे केले आणि त्यात बसून तो आणि त्याचा मुलगा हे बाहेर पडले. त्यांनी तडक मथुरेची वाट धरली.

जेधे शकावली, सभासद, एक्क्याण्णव कलमी बखर यांतही महाराज पेटा-यांत बसून पळाले असा उल्लेख येतो.

या सर्वांना आधार आहे तो राजस्थानी पत्रात व्यक्त झालेल्या माहितीचा. परंतु ती माहिती तर्काधारित आहे. तेंठा याछे मनसुबो कर और या लहरी छे भागवा की... या विधानावरून हे स्पष्ट होते, की विचारविनिमय करून केलेला हा एक तर्क आहे.

आलमगिरनामा हा औरंगजेबाच्या कारकीर्दीच्या पहिल्या दहा वर्षांचा अधिकृत इतिहास. त्याचा लेखक महंमद काजम हा औरगजेबाचा अधिकारी होता आणि हा ग्रंथ त्याने औरंगजेबाच्या देखरेखीखाली लिहिला, असे त्याने म्हटले आहे. या ग्रंथात महाराज पेटा-यात बसून पळाले असा उल्लेख नाही.
मोगल अकबार या उल्लेखास दुजोरा देत नाही.
सेतुमाधवराव सांगतात, की तेथे निष्कर्ष आहे वेशांतराचा.
पेटा-यांची ये-जा होती. ते पाहणा-यांच्या गर्दीत महाराज वेशांतर करून मिसळले आणि निसटले. संभाजीराजांना पेटा-यात बसविले असणे शक्य आहे. पण महाराज स्वतःला अगतिक आणि कुचंबलेल्या अवस्थेत पेटा-यात कोंडून घेतील हे त्यांच्या स्वभावावरून आणि सावधगिरीवरून शक्य वाटत नाही, असे सेतुमाधवराव म्हणतात.

मग ही पेटा-यात बसल्याची कथा कशी आली?
सेतुमाधवराव म्हणातात –
पेटा-यात लपून गेले त्यामुळे आम्हांला दिसले नाहीत, असे सांगून आपली सुटका करून घेण्याची ही मोगल अधिका-यांची युक्ती नसेल कशावरून? खुद्द औरंगजेबाचा या गोष्टीवर मुळीच विश्वास नव्हता.

त्या काळात स्वराज्यातही अनेकांना तसे वाटत नव्हते. कवि भूषणचे उदाहरण पाहण्यासारखे आहे.
कवि म्हणतात –
कांधे धरि कांवर चल्योदी जबचाव सेती एकलिये
जात एक जात चले देवा की
भेषको उतारि डारि डंवर निवारी
डा-यौ ध-यौ भेष ओर
जब चल्यौ साथ मेवा की
पौन हो कि पंछी हो कि गुटका की
गौन होकि देखो
कौन भांति गयौ करामत सेवा की
वेष बदलून खांद्यावर कावड ठेवून महाराज मिठाईच्या पेटा-याबरोबर निघून गेले. महाराज काय तोंडात जादूची गोळी धरून गेले की पक्षी बनून गेले की वारा बनून गेले? काय चमत्कार करून गेले याचा पहारेक-यांना पत्ताही लागला नाही.

त्याचा शंभर टक्के खात्रीलायक पत्ता तसा अजूनही लागलेला नाही.
अर्थात महाराज कसे याहून, सुटले याला मोल आहे.


संदर्भ : श्री छत्रपती नि त्यांची प्रभावळ, 
सेतुमाधवराव पगडी, 
परचुरे प्रकाशन मन्दिर, 
१ मे २०११, पृ. १४ ते ३५
छायाचित्र : आग्रा किल्ल्यासमोरील शिवछत्रपतींचा पुतळा

गोष्ट – लवणाची आणि एका महाकुंपणाची

महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह केला. दांडीयात्रा म्हणून स्वातंत्र्याच्या इतिहासात ते प्रकरण येते. असे म्हणतात, की गांधीजींनी जेव्हा त्या सत्याग्रहाचा प्रस्ताव मांडला होता, तेव्हा काँग्रेसमधील अनेक नेत्यांचा त्याला विरोध होता. त्यांचे म्हणणे असे, की त्याहून अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. जमिनीवरील कराचा प्रश्न आहे. तर त्याविरोधात सत्याग्रह करावा. परंतु गांधीजींनी मिठाच्या कराविरुद्ध आंदोलन छेडले. ते प्रचंड यशस्वी झाले.
हा सर्व इतिहास वाचत असताना नेहमीच एक प्रश्न पडत असे, की गांधीजींनी सत्याग्रहासाठी मीठच का निवडले? मीठ ही जीवनावश्यक वस्तू आहे. ती सर्वांसाठीच आवश्यक आहे. म्हणून त्यांनी त्यावरील कराचा प्रश्न हाती घेतला, हे समजते. तरीही एका साम्राज्याला आव्हान देण्यासाठी गांधीजींनी मिठाची निवड करावी आणि त्या साम्राज्यानेही प्रचंड ताकदीनिशी त्याचा प्रतिकार करावा, हे गणित काही नीट लक्षात येत नव्हते. येथे कुठेतरी काही तरी सुटते आहे असे सतत वाटत होते. त्याचे उत्तर रॉय मॉक्सहम यांच्या द ग्रेट हेज ऑफ इंडिया या पुस्तकातून मिळाले. (मॉक्सहम म्हणजे तेच – आऊटलॉ : इंडियाज बँडिट क्विन अँड मी या पुस्तकाचे लेखक.) आनंद अभ्यंकर यांनी केलेला या पुस्तकाचा अनुवाद अचानक हाती पडला आणि मीठ हे ब्रिटिश साम्राज्यासाठी किती महत्त्वाचे होते, हे समजले. त्याचबरोबर हिंदुस्थानच्या इतिहासातील एक अत्यंत रंजक अशी माहितीही हाती लागली. अशी माहिती, की जी आजवर कोणत्याही इतिहासाच्या पुस्तकाने आपणांस दिलेली नव्हती, कोणीही आपणांस सांगितली नव्हती.

तर पहिल्यांदा हे पुस्तक मिठाच्या महत्त्वाविषयी काय सांगते ते पाहू. –
‘शरीराला आपली कार्ये चालविण्यासाठी सोडियम क्लोराईड म्हणजे मिठाची गरज असते. शरीराच्या वजनाच्या १/४०० भाग इतके मिठाचे वजन असते. मानवाच्या शरीरात सरासरी सहा औंस (सुमारे १०० ग्रॅम) मीठ असते.
रक्तातील मिठाचे प्रमाण कायम राखण्यासाठी, घामातून झालेला जलक्षय भरून काढण्यासाठी आपण प्यालेलं सर्वच पाणी शरीर राखून ठेवेल असे नसते. जास्तीचे पाणी लघवीच्या रुपाने बाहेर टाकले जाते. अशा स्थितीत शरीरातील रक्ताचे आकारमान कमी होते. रक्तदाब त्यामुळे कमी होईल. मिठाचा क्षय अशा रीतीने सुरूच राहिला, तर रक्ताचे आकारमान आणखी कमी होईल आणि रक्तदाब सतत कमी होत राहील. मेंदूचा रक्तपुरवठा कमी होईल. त्यामुळे झीट येऊ शकते आणि अखेरीस संपूर्ण बेशुद्धावस्था येऊ शकते.’ 
तर मिठाअभावी माणसाचा मृत्यू होऊ शकतो. भारतासारख्या उष्ण हवामानाच्या देशात घाम येण्याचे प्रमाण अधिक. तेव्हा मिठाचे सेवनही अधिक.

अंतर्गत शुल्क विभाग आयुक्तांच्या १७६९च्या वार्षिक अहवालानुसार :
“ज्या ठिकाणी मीठ तयार होते ती क्षेत्रे व त्याच्या अगदी नजीकचे भाग वगळता सीमाशुल्क रेषेच्या बाहेरच्या १०० मैलांच्या टापूत – जेथे करविरहित मीठ उपलब्ध आहे – राहणा-या प्रत्येक प्रौढ व्यक्तीचे मिठाचे सरासरी प्रमाण १३ पौंडांपैक्षा नक्कीच कमी नाही आणि प्रत्यक्षात कदाचित ह्यापेक्षा जास्त असू शकते. परंतु प्रत्यक्ष चौकशी व लोकसंख्या आणि त्यांना पुरवठा झालेल्या मिठाची राशी पाहता हे सिद्ध झाले आहे की, प्रत्येक प्रौढ माणसाची सरासरी मिठाची गरज – सीमाशुल्क रेषेच्या आतील भागात – ८ पौंडांपेक्षा जास्त नाही.”
पुन्हा हे मीठ केवळ माणसांनाच नाही, तर जनावरांनाही लागे. भारतात व्यापार करण्यासाठी आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीला मिठाचे व्यापारी महत्त्व बरोबर समजले. त्यांनी मिठावर कर लावला.

तसा ‘भारतात फार पुरातन काळापासून मिठावर कर लावण्यात येत आहे. सम्राट चंद्रगुप्त मौर्य... याने मिठावर कर लावलेला होता... (तेव्हा) एक विशेष अधिकारी – ज्याला लवणाचार्य असे संबोधले आहे – तो मिठाच्या व्यवहारासंबंधी जबाबदार होता. मीठ तयार करणा-यांना शुल्क आकारून परवाना दिला जाई किंवा त्याच्या मिठाच्या उत्पादनाच्या एक षष्ठांश हिस्सा राजाला देण्याच्या हमीवर त्याला परवाना दिला जाई... असे वाटते की, मिठावर एकूण कर २५ टक्के इतका असावा. ब्रिटिश सरकार भारतात येण्यापूर्वी अशा स्वरूपाचा अथवा थोडा कमी कर कायम आकारला जात होता. ब्रिटिश आल्यावर तो थोडा वेगळा झाला.’

रॉबर्ट क्लाईव्ह हा मोठा लाचखोर अधिकारी होता. त्याने १७६५ मध्ये एक खासगी कंपनी स्थापन केली. या ‘नव्या कंपनीला तंबाखू, सुपारी आणि मीठ या वस्तूंवर कुठल्याही प्रकारे नफा मिळविण्याचे एकाधिकार दिले. कंपनीने इतरांना मीठ, सुपारी व तंबाखू यांच्या उत्पादनावर बंदी घातली. कंपनीच्या गोदामांत मीठ पोचविण्यासाठी कंत्राटे देण्यात आली आणि व्यापा-यांना याच कंपनीकडून मीठ घेण्याची सक्ती करण्यात आली. पुढे १७६७ मध्ये ब्रिटिश सरकारच्या दबावामुळे या कंपनीने तंबाखू आणि सुपारीवरील आणि १७६८ मध्ये मिठावरील एकाधिकार सोडून दिला. मात्र तोवर कंपनीने ६५ लाख ३१ हजार १७० रुपये इतका नफा कमावला होता.’

‘१७७२ मध्ये वॉरन हेस्टिंग्जने कारभार हाती घेतला. त्यावेळी मिठावर दर मणास सुमारे पाच आणे कर होता. त्यातून कंपनीला सालीना साडेचार लाख रूपये मिळत. हेस्टिंग्जने या उत्पन्नात वाढ करण्याचे ठरवले.’ त्याने अमलात आणलेल्या नव्या पद्धतीमुळे ‘पहिल्याच वर्षात म्हणजे सन १७८१-८२ मध्ये मिठापासून मिळालेले उत्पन्न २९ लाख ६० हजार १३० रुपये होते. सन १७८४-८५ या वर्षांपर्यंत ते वाढून ६२ लाख ५७ हजार ४७० रुपयांपर्यंत गेले.’

मिठावरील करामुळे ते आता परवडेनासे झाले होते. डॉ. जॉन क्रॉफर्ड या गृहस्थाने ब्रिटिश संसदेच्या विशेष समितीला सन १८३६ मध्ये दिलेल्या पुराव्यानुसार,
‘१८२३ मध्ये देशातील अनेक भागांत भेसळयुक्त मिठाची किंमत दर मणास १२ रुपये इतकी होती. ही किंमत मजुरांच्या सालीना उत्पन्नाच्या अर्धी होती.’ 
बंगालच्या दुष्काळात लक्षावधी माणसे अन्नान्न दशा होऊन मेली. त्यातील अनेकांच्या मृत्यूस मिठाची कमतरता कारणीभूत होती. सरकारने केलेली साठवणूक, वाढवलेले दर आणि प्रचंड कर यांचा तो परिणाम होता.

ब्रिटिशांनी हिंदुस्थानची कशी लुटमार केली त्याचे हे एक उदाहरण. महात्मा गांधींना मिठावरील कराचा प्रश्न इतका का महत्त्वाचा वाटत होता, त्याचे हे उत्तर. आणि त्यांच्या सत्याग्रहाला इतका प्रतिसाद का मिळाला, त्याचेही हेच उत्तर.

आता वर उल्लेख केलेल्या गौप्यस्फोटाविषयी...

कंपनीने मिठावर एकाधिकार प्रस्थापित केला. मिठाची किंमत वाढवली. त्यामुळे मग आपोआपच अनधिकृत मीठ निर्मिती सुरू झाली. लोकांनी स्वस्त मीठ विकण्याचे प्रयत्न सुरू केले. मिठाची तस्करी होऊ लागली. कंपनी सरकारच्या सत्तेच्या सीमेपलीकडील प्रदेशातून तस्करी करून मीठ आणले जाऊ लागले. त्यामुळे कंपनी सरकारच्या महसुलाला प्रचंड धोका निर्माण झाला. ही अवैध मीठविक्री रोखण्यासाठी कंपनीने कंबर कसली आणि त्यातून येथे निर्माण झाले – द ग्रेट हेज ऑफ इंडिया.
‘मिठाची तस्करी थांबविणे आणि साखर, तंबाखू व इतर किरकोळ पदार्थांवर सीमाशुल्क कर वसूल करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने बृहत् बंगालमध्ये सर्वत्र सीमाशुल्क भवने स्थापन केली. सन १८०३ च्या कायद्यात प्रत्येक शासकीय जिल्ह्यामध्ये एक सीमाशुल्क इमारत किंवा चौकी तयार करण्याची तरतूद करण्यात आली. त्याच्या पुढच्याच वर्षी आलेल्या एका नवीन कायद्यामुळे बंगाल प्रेसिडेन्सीमध्ये प्रत्येक प्रमुख रस्त्यावर व नद्यांवर सीमाशुल्क कुंपण उभारण्यात आले.’ 
ही त्या महाकुंपणाची सुरूवात होती. याबाबत सर जॉन स्ट्रॅस्ट्रॉची यांची एक टिपण्णी आहे. ते लिहितात –
“मिठावरील लादलेल्या कराची निश्चितपणे वसुली करण्यासाठी एक राक्षसी पद्धत हळूहळू उदयाला आली. या पद्धतीची तुलना होईल असे उदाहरण कुठल्याही सुसंस्कृत मानवी समाजाच्या इतिहासात सापडणार नाही. ही पद्धत सबंध भारत देशात निर्माण करण्यात आली. सन १८६९ मध्ये ही रेषा सिंधू नदीपासून तत्कालीन मद्रास प्रांताच्या महानदीपर्यंत निर्माण करण्यात आली. या सीमारेषेची लांबी दोन हजार ५०० मैल होती व तिचे रक्षण १२ हजार माणसे करीत होती. ही लांबी म्हणजे लंडन ते कॉन्सँटिनोपल इतके अंतर होईल. ही सीमारेषा म्हणजे काटेरी झाडे व झुडुपे यांनी तयार केलेल प्रचंड अभेद्य असे कुंपण होते.”

पुस्तकातील नकाशानुसार हे कुंपण सध्याच्या पाकिस्तानातील तोरबेला, मुलतान असे पसरत पुढे फझिल्का, हिस्सार ते पुढे दिल्लीला वळसा घालून आग्रा, झाशी, होशंगाबाद, खांडवा, चंद्रपूर आणि रायपूरपर्यंत येऊन थेट ओरिसातील महानदीपर्यंत पसरलेले होते.

कसे होते हे कुंपण? तत्कालीन सीमाशुल्क आयुक्तांचा एक अहवाल सांगतो -
“हे अडथळे इतके मजबूत होते, की त्यामधून मनुष्य वा जनावर जाण्याची सुतराम शक्यता नाही... आदर्श स्थितीत कुंपण हे हिरव्या झाडाझुडपांचे असते. त्याची उंची दहा ते चौदा फूट आणि रुंदी सहा ते बारा फूट असते. ह्या झुडपांमध्ये मुख्यत्वे बाभूळ, बोर, करवंद, नागफणा आणि शेर अशा काटेरी झुडुपांचा जमिनीच्या मगदुराप्रमाणे समावेश केला जातो. ह्या सर्व झुडुपांची वेळोवेळी छाटणी करून त्यांचा आकार राखला जातो. ह्या झुडुंपावर काटेरी वेली सोडून संबंध कुंपण दाट केले जाते.”
विश्वास न बसावा अशी ही गोष्ट आहे. या भारतात इंग्रजांनी एवढे मोठे, दोन हजार ५०० मैलांचे कुंपण घातले होते. द ग्रेट हेज ऑफ इंडिया हे पुस्तक म्हणजे ब्रिटिश लेखक रॉय मॉक्सहम यांनी लावलेल्या या कुंपणाच्या शोधाची कहाणी आहे. १९९५ मध्ये त्यांनी घेतलेल्या एका पुस्तकात त्यांना या कुंपणाचा ओझरता उल्लेख आढळला. त्यांचे कुतुहल चाळवले आणि मग त्यांनी असंख्य कागदपत्रे पालथी घातली. भारतात आले. येथे भटकले. खूप भटकले आणि महत्प्रयासाने त्यांनी या कुंपणाचे अवशेष शोधून काढले. त्यांनी हे कुंपणच शोधले असे नव्हे, तर अनुवादक आनंद अभ्यंकर यांनी म्हटल्याप्रमाणे ब्रिटिश अमानुषतेची कुंपणनीतिच उजेडात आणली.

(जाता जाता : महात्मा गांधी यांच्या मिठाच्या सत्याग्रहाने भारतीय राजकारणाची दिशा बदलली. (हे मॉक्सहम यांचे मत.) पण अजून मिठावरील कर रद्द झाला नव्हता. तो ब्रिटिश भारत सोडून जाण्यापूर्वी सहा महिने, २८ फेब्रुवारी १९४७ रोजी रद्द झाला.)

मीठ : ब्रिटिश अमानुषतेची कुंपणनीति
The Great Hedge Of India या Roy Moxham 
यांच्या मुळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद.
अनुवादक – आनंद अभ्यंकर. 
मोरया प्रकाशन, प्रथमावृत्ती २००७, पाने २०८, किंमत २०० रु.